पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के! नागरिकांमध्ये घबराट सुदैवाने जीवितहानी नाही
नाशिक प्रतिनिधी

दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भूगर्भातील हालचालींमुळे भूकंपाचे सौम्य धक्के बसण्याचे सत्र सातत्याने सुरूच आहे. आज पुन्हा एकदा पेठ तालुक्यातील इनामबारी आणि मांगोण परिसरामध्ये सायंकाळी ४:५३ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या अचानक बसलेल्या धक्क्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे व घबराटीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा आणि दळवट परिसरामध्ये भूगर्भातील हालचालींचा वेग वाढला असून, ग्रामस्थांना सातत्याने हे धक्के जाणवत आहेत. काही नागरिकांना हे धक्के तीव्रतेने जाणवतात, तर काहींना ते सहजासहजी लक्षात येत नाहीत. मात्र, शासन दरबारी सुरगाणा, दळवट आणि आता पेठ तालुक्यातील काही गावांमध्ये या भूकंपाच्या धक्क्यांची अधिकृत नोंद झाली आहे.
आज सायंकाळी धक्का बसताच नागरिकांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली आणि एकमेकांना फोन करून या वृत्ताची खातरजमा केली. सोशल मीडियावरही या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली.
प्रांतधिकाऱ्यांचे पंचनाम्याचे आदेश.
या घटनेबाबत माहिती देताना प्रांत अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले की, “इनामबारी व मांगोण परिसरामध्ये सायंकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची नोंद झाली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक तहसीलदार व तलाठी यांना तातडीने घटनास्थळी पाठवून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत कुठेही कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच घरांचे किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.”
तज्ज्ञांचे पथक दाखल:
गेल्या काही दिवसांपासून हे सत्र थांबत नसल्याने दिल्ली आणि मुंबई येथून तज्ज्ञ भूवैज्ञानिकांची पथके पाहणीसाठी येऊन गेली आहेत. भूगर्भातील या हालचाली आणि सौम्य धक्के काही काळ असेच पुढे चालू राहण्याची शक्यता या पथकाने वर्तवली आहे.
प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
सतत बसणाऱ्या या धक्क्यांमुळे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापि, धक्के अत्यंत सौम्य स्वरूपाचे असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रांत डॉक्टर आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे. दरम्यान शासनाने वारंवार होणारे भूकंपाचे धक्के दुर्लक्षित करू नये व त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच काही धोका असेल तर त्याबाबत माहिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



